Thursday 1 June 2017

अल्पायुषी मराठे आणि bacteria - भाग २

गेल्या भागात आपण इन्फेक्शन आणि त्यांच्या मध्ययुगीन आयुष्यावर होणारा परिणाम यावर थोडीशी चर्चा केली. आता याचे पुढील विवरण इथे करायचा प्रयत्न करतोय. थोडा घाईत आहे. त्यामुळे हि पोस्ट थोडी छोटी असेल. पोटाच्या (टायफाईड, आतड्याचा टीबी, गुढघी इत्यादी) विकारांमुळे बाजीराव, माधवराव, नानासाहेब, चिमाजी, शिवछत्रपती इत्यादी दिग्गज वारल्याचे आपण मागच्या भागात बघितले. स्वच्छतेची साधने आणि सामान्यतः त्या काळातले मनुष्यजातीचे या विषयाबाबतचे अज्ञान हे या मागची कारणे आहेत. आता मुख्य प्रश्न असा कि मोगलांचे सरदार इतके कसे काय जगले?

ऐतिहासिक वस्तुस्थिती हि आहे कि हिंदूंचे स्वच्छतेबाबतचे आग्रह आणि विटाळ इत्यादी खूप कडक असतात. गुप्तकाळात आणि त्या नंतरच्या वर्धनकाळात चीनी प्रवासी लोकांनी भारतीय दिवसातून दोन वेळेस आंघोळ करतात व स्वच्छतेबाबतीत खूप आग्रही आहेत हे वारंवार सांगितलेले आहे. हि बाब नंतरच्या युरोपीय प्रवाश्यांच्या रोजनिशीत देखील वरचेवर आढळते. तत्कालीन विश्वात भारतीय लोक आणि त्यातल्यात्यातल हिंदू हे स्वच्छतेचे अत्याग्रही असत हे दिसते. मग पेशवे मंडळींच्या घरात पुरुष मंडळी अशी वरचेवर या आजारांमुळे का मरावीत कि जे आजार विष्ठेमुळे पसरले जाऊ शकतात? दुसरा प्रश्न असा कि त्या घरातल्या स्त्रियांना हे पोटाचे आजार होऊन ते वारले वगैरे माझ्यातरी वाचनात नाही. इथे एकाच फरक आहे कि स्त्रिया मोहिमेवर जात नसत. तस्मात पुरुष मंडळींना हे इन्फेक्शन मोहिमेवर असतांना झाले असावे असे माझे गृहीतक आहे.

हे होण्याचे जे कारण मला सुचते आहे ते मी इथे लिहोतो. मराठी मोहिमा सहसा वेगवान असत. बाजारबुणगे असत पण अगदी bare-minimum. तिथे सफाई करणारा crew (इथे नाईलाजास्तव जातींचा उल्लेख करावा लागत आहे, क्षमस्व) जसे महार-मांग-भंगी कमी असावेत किंवा नसावेत असा माझा कयास आहे. सैनिक म्हणून नव्हे तर सफाई-कामगार म्हणून. सैनिक म्हणून अनेक महार शिपाई आणि सरदार मराठी सैन्यात अगदी १८१८ पर्यंत मुबलक प्रमाणात होते हे आपल्याला प्राथमिक साधनांवरून माहिती आहे. पानिपतच्या मोहिमेत हि मंडळी इतकी तरली कारण भरपूर बाजारबुणगे नेले होते (त्यात हे सफाईदल देखील आले). म्हणून तर एक-दिड महिन्यानंतर रोगराई वगैरे पसरू लागली (अन्यथा आधीच पसरली असती जे बरे झाले असते कारण मन आधीच युद्ध झाले असते आणि कदाचित आधी युद्ध झाले असते तर विजय मिळाला असता, असो.)

बाजीरावाच्या मोहिमेत, नानासाहेबांच्या आधीच्या मोहिमेत, चिमाजीअप्पांच्या मोहिमेत आणि माधवरावाच्या राक्षसभुवन मोहिमेत असा मोठा बाजारबुणग्यांचा crew होता असे वाचनात तरी नाही. या उलट मोगलांच्या मोहिमा फारच मोठ्या आणि elaborate असत (म्हणून हळूहळू चालत - त्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे). सोबत जनानखाना, मुद्पाकखाना, आणि इतर सर्व लवाजमा चाले. यात उपर्लिखित सर्व गोष्टी आल्यात.

आधीच्या मुसलमानांच्या मोहिमांच्या काळात (खिलजी, तुघलक़, लोधी वगैरे मंडळी) त्यांचे बरेच सुलतान रोगराईमुळे भरपूर मेली आहेत. बरेच लोक गुप्तरोगांमुळे मेली (अनिर्बंध बलात्कार आणि स्त्रियांचा, पुरुषांचा, लहान मुलांचा वासनांध उपभोग) हे आपल्याला दिसतेच. त्या काळात देखील मोहिमांच्या शीघ्रतेमुळे सफाईदल सोबतीला नसावे (अल्लाउद्दिन खिलजी ८००० स्वारांनिशी देवगिरीवर चालून आला हा इतिहास आहे). सपोर्ट-crew कुठल्याही मोहिमेमध्ये खूप आवश्यक गोष्ट आहे.

काहीकाही मोहिमांचे स्वरूप असे असते कि तिथे असल्या लवाजम्याला जागा नसते. उदाहरणार्थ फक्त घोडदल असेल तर - जी बाजीराव आणि इतर मराठे बहुतांश असायचे). पण जर तोफखाना, पायदळ वगैरे सोबत असेल तर असा सपोर्ट-crew न्यावाच लागतो (तोफा ओढणारी असंख्य जनावरे असतात त्यांची साफसफाई अत्यावश्यक असते). माझ्या मते अश्या मोहिमांमध्ये सफाईदल प्रकर्षाने न्यावेच लागते.

 जाता जाता - पानिपतात महादजी शिंद्यांचा जीव अश्याच एका भिस्ती माणसाने वाचवला होता. भिस्ती लोक याच सफाईदलाचे लोक असतात.