Sunday 21 May 2017

माधव मोहन आणि दिल्ली - 2011 मधील लेख

वक्तव्य - किमान १०० वर्षे तरी भारताचे सत्ताकेंद्र गंगाखोऱ्यातील दिल्लीनिष्ठ लोकांच्या तावडीतून बाहेर येणे आवश्यक आहे.

स्पष्टीकरण आणि टीका - 

पुढे जे लिहेन ते ताळतंत्राने वाचावे. राज ठाकरे यांना समर्थन किंवा भाषीय अस्मितेला फुंकर वगैरे काही नाही. हिमालय (आणि त्याचे दोन बाहू - हिंदुकुश आणि राक्षिनी) पासून दक्षिण समुद्रापर्यंत पसरलेला भारतीय उपखंड हे एक प्राचीन सांस्कृतिक राष्ट्र आहे आणि त्यावर इथल्या लोकांचे (पक्षी:हिंदू) तंत्र चालावे, आणि ते साध्य मिळविण्यासाठी हर एक मार्ग चोखाळावा, हे माझे सरळ मत आहे. 

मी जर दिल्लीत गेलो तर मला गोष्टी कश्या दिसतात ते मी लिहिती. एका सिंधू-गंगा खोऱ्यातल्या दिल्लीनिष्ठ नेत्याचे मनोगत असे असते - 

"आम्ही सिंधू-गंगा देशाचे लोक आहोत. सिंधू-गंगा खोरे हे भारताचे एक महत्वाचे अंग असून यात आमचे (सांप्रत काळातले) पाकिस्तानी आणि बांगलादेशी बंधू देखील आले). या सिंधू-गंगा देशाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे दिल्ली जिथून आम्ही सिंधू-गंगा देशाचे राजकारण आणि अर्थकारण हाकतो. आमच्या या प्रांतात हिंदू आणि मुस्लीम समसंख्येने नांदतात आणि ढोबळमानाने पाहता दोघेही तितकेच गुंड प्रवृत्तीचे आहेत. आमच्या इथल्या व्यापारी वर्ग, मुल्ला वर्ग, राजकारणी आणि बाहुबली वर्ग यांचे हितसंबंध गेली ५०० वर्षे आपसात खूप गुंतलेले आहेत. अकबराच्या नीती या गुंतागुंतीला जबाबदार आहेत. आमच्यावर राज्य देखील (अकबरापासून) सारख्याच गुंडांनी केले आहे ज्यांना जनतेची काडीमात्र देखील परवा नव्हती. आमच्या नद्या, आणि प्रांत देखील सारखे आहेत. 
माळवा आणि विंध्याच्या दक्षिणे कडचे लोक यांनी उगाच मधून मधून येऊन इथली बसलेली घडी विस्कटण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. १७६१ पानिपत. आम्ही सिंधू-गंगा वासीयांनी एक होऊन हा प्रयत्न हाणून पाडला. आधुनिक काळात तर कांग्रेसचा राजवंश सिंधू-गंगा खोऱ्यात स्थिर आहे. भाजपाचे काही क्षत्रप फक्त आता तिथे राहिले आहेत आणि ते "आमचा" हिस्सा आहेत. हे गडकरी-मोदी वगैरे बाहेरचे लोक (यात पवार पण आले) उगाच आमचे संबंध बिघडवत असतात. म्हणून आम्ही सिंधू-गंगा देशीय लोक यांचा उत्तर-हिंद च्या राजकारणातला चंचुप्रवेश रोखून धरू." 

हे generalization आहे हे मान्य आहे. याच सिंधू/गंगा देशात जाट-शीख-बुंदेले-क्रांतीकारात-१८५७ चे स्वातंत्र्यसेनानी देखील होते. पण ढोबळमानाने जातीय-सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध आणि त्या अनुषंगाने होणारे राजकारण असे आहे. हितसंबंधांचे हे रुतलेले नेटवर्क भारताच्या (आणि हिंदूंच्या) उत्थानास रोधक आहे. आडवाणी-मुरली मनोहर जोशी - वाजपेयी वगैरे लोकांबद्दल मला अतिव आदर आहे. पण कालांतराने (१९९९ पासून) हे देखील या नेटवर्कचा भाग बनले. 

रा.स्व.संघ हा आधुनिक काळातला मराठ्यांचा उत्तराधिकारी आहे. त्याचा उगम आणि व्याप्ती देखील त्याच प्रदेशात अधिक आहे जो प्रदेश मराठ्यांनी तुडवला आणि जिंकला आणि त्यावर राज्य केले. इतर प्रदेशात तो वाढतोय अथवा कमी होतोय, पण या प्रदेशात हि विचारसरणी लोकांना सहज समजते (भलेही त्याचे रुपांतर भाजपला मिळणाऱ्या मतात होत नसेल, तो वेगळा मुद्दा आहे). सिंधू-गंगा खोऱ्यातल्याच शीख-जाट-अहोम वगैरे उदयमान लहान लहान लोकांना मदत करण्याऐवजी मराठ्यांना मोगल-शुजा-नजीब-अलीवर्दी जवळचे वाटले. तीच गत संघ-भाजपातल्या काही उत्तर-हिंद मध्ये रुतलेल्या नेत्यांची झाली आहे. आणि तीच चूक माधवरावासारखे मोहनराव दुरुस्त करीत आहेत. माझी खूप अंतस्थ इच्छा आहे कि माधवासारखी अचानक आणि अर्धवट exit मोहनरावांना घ्यावी लागू नये. काम पूर्ण करून घडी व्यवस्थित बसवून मोहनरावांनी exit घ्यावी. 

माधवाने गंगेतल्या लोकांशी असलेल्या संबंधांचा फेरविचार केला. नवीन लोक पाठवले, होळकरांचे महत्व कमी करून महादजी यांना अधिक अधिकार दिले. बरोडा, नागपूर, कोल्हापूर, सातारा-पुणे-कटक-तंजावर इत्यादी प्रांतातल्या क्षत्रपांशी पुनः चांगले संबंध प्रस्थापित केले. नानासाहेबांच्या कारकीर्दीत पानिपतामुळे विस्कटलेली घडी नीट बसवली. जें खरे शत्रू त्यांना शासन केले (निजाम-मोगल-नजीब). अंतस्थ षंढ लोकांचा बंदोबस्त केला (राजपूत) आणि दुरावलेल्या आपल्या लोकांना परत जवळ करणे सुरु केले. थोडक्यात काय तर शत्रूपक्षातल्या जुन्या रुतलेल्या नेटवर्कला पद्धतशीर पणे उसवणे सुरु केले आणि आपले नेटवर्क अधिक भक्कम केले. मोहनराव थोडक्यात तेच करत आहेत. आधुनिक काळातले राजपूत-शुजा-नजीब-मोगल-होळकर कोण हे समजणारे समजतीलच. इथे होळकर यांच्या बाबत माझ्या मनात किंतु बिलकुल नाही हे मी नमूद करू इच्छितो. त्यांनी जें राजकारण केले ती त्या काळातली त्यांची अपरिहार्यता होती. 


म्हणून मला या माणसाबद्दल तसाच आदर आहे जो गोळवलकरगुरुजींसाठी होता आणि तो मी वारंवार बोलून दाखवला आहे. भागवत सरसंघचालक होणे हि पडत्या काळात भारतासाठी एक खूप चांगली घटना होती. जो पर्यंत हे कार्य ते करीत आहेत (आणि ते पदावर असे पर्यंत करीत राहोत) तो पर्यंत माझा त्यांना पूर्ण पाठींबा. या कार्यात गडकरी एक प्यादे आहेत हे स्वतः गडकरी जाणून आहेत. फुकाचा अहंकार त्यांच्यात अजून आला नाही. आशा आहे कि मोदीदेखील आतून हि जाण ठेवत असतील. माझे वरील विचार म्हणजे मोहनरावांच्या प्रती व्यक्तिनिष्ठता नाही. हा या नवीन व्यवस्थे प्रती असलेला आशावाद आहे जो या माणसाच्या "वर्क-कल्चर", निर्णय, आणि नितींमुळे फुलला आहे..

1 comment:

  1. अगदी नेमक बोट ठेवलय तुम्ही । उत्तर भारत मधुन संस्कृति च नष्टप्राय झालीय।

    ReplyDelete