Sunday 21 May 2017

पी.व्ही.नरसिंहराव - आधुनिक भारताचा राष्ट्रपिता

आधुनिक काळातला सर्वोत्कृष्ट भारतीय नेता म्हणजे पी.व्ही.नरसिंह राव....  हा माणूस इतका उपेक्षित आहे कि विचारू नका. पण हा नसता तर भारत आता पर्यंत तुटला असता.. 

१. नरसिंह राव
२. अटलबिहारी वाजपेयी
३. इंदिरा गांधी (आणीबाणी मुळे नंबर खाली, अन्यथा दोन नंबर वर असत्या)

कुणाचा भाग्योदय कधी आणि कसा होईल सांगणे कठीण असते. ज्योतिषात एक विपरीत राजयोग म्हणून प्रकार ऐकून आहे. याचा ज्योतिषीय अर्थ आणि संदर्भ नक्की काय ते माहिती नाही, पण ज्यांचा विपदा कोसळल्यावर विपरीत परिस्थितीत दुसऱ्याच्या नुकसानामुळे काही लोकांचा भाग्योदय ज्या योगामुळे होतो  त्याला विपरीत राजयोग असे म्हणतात. नरसिंहराव हे खरे विपरीत राजयोगी. हे खरे आहे कि ते मंत्री म्हणून चमकले नाही. जागतिक  ब्यांकेचा रेटा होता हे खरंय, पण ज्या तऱ्हेने हे त्यांनी काम केले ते अप्रतिम होते.

पण पंतप्रधान झाल्यानंतर ते ३-४ वर्षात एक खूप मोठे आणि प्रचंड चक्र फिरवून गेले जे आजतागायत फिरतंय. भारताला पहिल्यांदा एक जेनुईन बुद्धीजीवी आणि संपूर्णपणे तटस्थ माणूस पंतप्रधान म्हणून भेटला. अर्थव्यवहार, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण क्षेत्रातले लोक यांना खूप दुवा देतात. सोवियत युनियनच्या पतनानंतर कुठल्याही युनो मध्ये सांभाळून घेणाऱ्या मायबापाशिवाय  या नवीन जगात चालायला सुरुवात यांनी करून दिली. काश्मीर मध्ये प्रॉब्लेम सुरु झाला होतं, पंजाब धुमसत होता, सोने गहाण टाकावे लागले होते, पूर्वेत नक्षली लोकांनी उच्छाद मांडला होता, श्रीलंकेत आणि तामिळनाडू मध्ये लिट्टे मंडळींनी नुकतेच राजीवगांधींना मारले होते आणि ३००० भारतीय जवान हुतात्मे झाले होते. समस्त शेजार शत्रू होता, आणि एकमेव मित्र लयाला गेला होता. भारतात हिंदू-मुस्लीम समस्या टोकाला जाऊ लागल्या होत्या, पाकिस्तानने अणुबॉम्ब कार्यान्वित केला होता (१९८९). 

हे सगळे आधीच्या पंतप्रधानांच्या पुण्याई मुळे घडले. यात जनता पार्टी चे मोरारजी देसाई देखील आले, आय.बी आणि रॉ वाले या गृहस्थाला खूप शिव्या घालतात. याने झिया-उल-हक यांच्याशी गप्पा मारतामारता सांगितले कि भारताला पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल माहिती आहे. एका खूप मोठ्या राष्ट्रीय सिक्रेट ची लिक या पंतप्रधानामुळे झाली होती, त्यामुळे ८० च्या दशकात (१९८६-८८) पर्यंत पाकिस्तानने चोऱ्यामाऱ्या करून आणि चीनशी मैत्री करून अणुबॉम्ब बनवला. विचार करा कि पाकिस्तान कडे अणुबॉम्ब आहे, आणि भारताकडे नाही, अश्या परिस्थितीत आतून आणि बाहेरून सर्वत्र भारत मार खात असताना ५ वर्षे राज्य करणे, आणि बाजी पालटणे हे खूप मोठ्या माणसाचे काम आहे.

अश्या परिस्थितीत कुणीच भारतात राज्य केले नाही. नेहरूंवर इंग्रजांचा आणि रशियाचा वरदहस्त होता. इंदिरांवर देखीलसोवियत रशियाचा पूर्ण वरदहस्त होता. नरसिंहराव आणि कारगील पर्यंतचे वाजपेयी, हे दोनच "स्वतंत्र" पंतप्रधान होते. क्लिंटन यांच्या भेटीनंतर, वाजपेयी देखील ढेपाळले. 

नरसिंह राव मुळे खालील गोष्टी झाल्या
१. अर्थव्यवस्था खुली झाली आणि त्या नादात देश विकल्या गेला नाही
२. अणु कार्यक्रम सुरु झाला. अणुबॉम्ब चे संपूर्ण श्रेय नरसिंह रावांना आहे. खुद्द वाजपेयींनी हे त्यांच्या मरणोत्तर कबुल केले आहे.
३. इस्राईल, विएतनाम सोबत मैत्री संबंध प्रस्थापित
४. काश्मीर संबंधी प्रस्ताव लोकसभेत व राज्यसभेत पारित करून घेतला. आता काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे व ते देऊन टाकायला लोकसभेत मंजुरी घ्यावी लागेल.
५. संरक्षण क्षेत्रात हळूहळू भारत स्वयंपूर्ण होऊ लागला (अग्नी, तेजस, आकाश, अर्जुन आणि इतर काही प्रकल्प यांनी सुरु केले)
६. कम्युनिस्ट लोकांना पूर्वेत रोखले.
७. रामजन्मभूमी आंदोलनात त्रयस्थ राहिले.
८. लायसन्स राज संपवला
९. शरद पवार व इतर प्रभृती यांना रोखले.
१०. काश्मीर मध्ये आर्मी घातली. सियाचीन वर सदैव सेना ठेवायचा निर्णय यांचा. चीनशी परत व्यापारी संबंध प्रस्थापित केले. आज तो व्यापार ६० अब्ज डॉलर इतका आहे. 

थोडक्यात जे जे काही नेहरूंनी करून भारताला ३% ग्रोथ रेट वर सीमित ठेवत होते, ते सर्व काढून आजचा ७-८% णे वाढणारा भारत बनवला. आजचा भारत (सर्व गुणदोषांसकट) नरसिंहरावांचा भारत आहे, नेहरू-महात्मा गांधी वगैरेंचा नाही. 

१९२१ साली तेलंगणा मध्ये रावांचा जन्म झाला. हे नक्की कुणाचे पुत्र हे माहिती नाही पण तेलंगणा मधल्या एका सधन ब्राह्मण कुटुंबाने या अज्ञात मुलाला दत्तक घेतले. हे आधीपासूनच सशस्त्र क्रांतीवाले होते. हैदराबादमुक्ती संग्रामात बॉम्ब वगैरे स्मगल करून ठिकठिकाणी स्फोट घडवायचे कार्यात यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. मराठीत उपलब्ध असलेले अभिनव भारत वगैरे संघटनांनी बनवलेले अनेक बॉम्ब बनवायचे पुस्तके यांनी तेलुगु मध्ये भाषांतरित केली (नंतर अनेक कादंबऱ्या त्यांनी मराठी मधून तेलुगु मध्ये भाषांतरित केली). मुक्तीसंग्रमानंतर ते तिथल्या विधिमंडळात निवडून आले. तिथे त्यांनी कुळकायदा राबवायला सुरुवात केली. या मुळे अनेक जमीनदार जातींना त्यांनी दुखावले पण सामान्यांचा दुवा घेतला. वंशाधिकाराने आलेली सर्व जमीन यांनी दान करून स्वतः उदाहरण प्रस्थापित करून दिले.. 

चांगले निर्णय कसे त्रासदायक ठरतात हे त्यांना १९७३ मध्ये समजले कारण इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त करून टाकले (कारण रेड्डी, नायुडू आणि कम्मा जातीचे तेलुगु जमीनदार भडकले होते, आणि राव ब्राह्मण असल्यामुळे यांच्या मागे एक वोट करणारी लॉबी नव्हती). त्यांच्या या कामाचे क्रेडीट दुसरा कुणीतरी खून गेला..

पण यांना हेरून इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. १९७३ च्या या हृदयभगानंतर यांनी एक धडा घेतला. वयाची पन्नाशी आली होती. तो धडा म्हणजे कॉंग्रेस मध्ये टिकायचे असल्यास कधीही आपली अक्कल लावू नये (ती कितीही बरोबर असली तरी गांधी सुलतानांपुढे आणि त्यांच्या हुजऱ्यापुढे शहाणपण चालत नाही).. या घटने नंतर त्यांचे १९९० पर्यंतचे करीयर म्हणजे गांधीघराणे भक्ती चा आदर्श परिपाठ होता. 

आणीबाणी मध्ये त्यांनी इंदिरांना समर्थन दिले. त्या बदल्यात इंदिरा गांधींनी त्यांना महत्वाचे खाते देणे सुरु केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "१२ भाषा उत्कृष्ट पणे लिहिता-बोलता-वाचता येणाऱ्या या  ज्ञानमार्तंड माणसाचे मन कधीच कुणालाच समजले नाही. कुणाही समोर याने आपले मन उघडे केले नाही".. 


इंदिरा गांधींच्या हत्येनंतर यांनी आपली निष्ठा राजीव गांधींच्या चरणी वाहिली. पण रावांचे वय झाले होते. १९९० मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पण त्यांच्या आयुष्यातला राजयोग तर सुरु होणार होता. राजीव गांधींची हत्या झाली आणि सर्वत्र घालमेल उडाली. 

हे नंतर समजले कि नरसिंहरावांनी छद्मनाम धारण करीत राजीव गांधींवर कडाक्याची टीका केली होती (१९८८-८७ मध्ये). इंडियन एक्सप्रेस मधला एक अग्रलेख खूप गाजला होता जो कॉंग्रेसच्या खूप आतल्या माणसाने लिहिला होता पण नाव दिले नव्हते. त्यांच्या मृत्युनंतर हे एक्सप्रेस ने उघड केले कि तो लेखक राव होते. असो, १९९० मध्ये रावांनी उघडपणे कधीही कुठलेही मतप्रदर्शन केले नाही. अर्जुन सिंह, शरद पवार, आणि नारायणदत्त तिवारी या तिघांच्या पंतप्रधान पदासाठी मारामाऱ्या सुरु झाल्या होत्या. कुणीच जिंकेन नि कॉंग्रेस तीन तुकड्यात जाणार अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा compromise candidate म्हणून रावांना तिघांनी मान्यता दिली. असे म्हणतात कि जेव्हा हा निर्णय त्यांना समजला तेव्हा राव आपल्या सामानाची packing करीत होते, कायमचे हैदराबादेत सेटल व्हायला. ते नुकतेच राजकारणातून निवृत्त झाले होते पण त्यांची निवृत्ती कॉंग्रेस कमिटी ने जाहीर केली नव्हती. 

पवार-सिंह-तिवारी त्रिकुटाची कल्पना होती कि निवडणुकी नंतर यांना हाकलून देऊ. पण १९९०-९१ च्या निवडणुकीत तिघांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि राव पंतप्रधान झाले.

अर्थात, याच काळात ग्रामीण गरिबी ३३% वरून ४८% पर्यंत गेली. अन्नधान्याच्या किमती १९९६ मध्ये ६०% ने वाढल्या असे वाचनात आले होते. या नीतीचा बोजा सर्वात खालचा सामाजिक थरावर पडू लागला. सबसिडी कमी केल्यामुळे लहान शेतकरी असणे हळूहळू त्रासदायक होऊ लागले. १९९६ मध्ये कॉंग्रेस निवडणुकीत हरली.

अर्थात हरता हरता रावांनी आडवाणींनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतलाच. त्यांना एका आर्थिक घोटाळ्यात गोवून त्यांची पंतप्रधान बनायच्या आशेवर पाणी फिरवले. वाजपेयी हे भाजपाचे compromise candidate म्हणून पुढे आले. १९९६ मध्ये वाजपेयींनी शपथ घेतली (१३ दिवसांचे सरकार) त्या शपथ विधी नंतर राव वाजपेयींशी हस्तांदोलन करायला आणि अभिनंदन करायला गेले. रावांनी हस्तांदोलन तर केले. पण त्यांच्या हातात एक चिट्ठी होती. ती गुपचूप पणे हस्तांदोलनाच्या निमित्ताने वाजपेयींच्या हातात दिली. त्या चिट्ठीमध्ये लिहिले होते - Bomb is ready, go ahead. रावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट वाजपेयींनी जाहीर केली. 

दीड वर्षांनी भारताने अणुबॉम्ब फोडल्या नंतर सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आल्या. त्याच दरम्यान कॉंग्रेस अध्यक्षपदाचे इतर उमेदवार राजेश पायलट आणि माधवराव शिंदे यांचा "अचानक अपघाती" मृत्यू झाला आणि सीताराम केसरी देखील त्याच ६ महिन्याच्या कालावधीत वारले. रावांनी काळाची पावले ओळखली आणि दिल्ली सोडली. उर्वरित काळ ते हैदराबादेत राहिले आणि २००४ मध्ये त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा फोटो देखील कुठेही नाही, कुणाही कॉंग्रेस वाल्याने त्यांना साधी श्रद्धांजली देखील वाहिली नाही. या थोर नेत्याला जाणीवपूर्वक विजनवासात आणि अज्ञातवासात ढकलण्यात आले.   

१९९० पूर्व नेहरूंच्या भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते - समाजवाद आणि non-allignment movement. या दोन्ही आधारस्तंभांना रावांनी कायमचे जमीनदोस्त केले. या सर्वांचे दोषही आता हळूहळू पुढे येत आहेत. पूर्वी सगळेच गरीब होते. आता मध्यमवर्ग-श्रीमंत-गरीब अशी दरी वाढू लागली आहे. त्यामुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम आता उघड दिसू लागले आहेत. 

भांडवलशाहीला पर्याय नाही. पण भांडवल फक्त शहरी भागात केंद्रित होऊ लागले. त्यामुळे गाव-शहर ही दरी वाढली. लोकांचे शहराकडे मायग्रेशन सुरु झाले, गावे ओस पडू लागली आणि शहरे बकाल. वास्तविक आता गावागावात भांडवल निर्मिती होणे आवश्यक आहे. पण ते होत नाहीये. 

रावांनी एका खूप मोठ्या संकटातून भारताला बाहेर काढले. भारताला जगासमोर खुले केले. जुन्या गांजलेल्या आणि माजलेल्या लायसन्सशाही वाल्या व्यवस्थेचा बिमोड केला, आणि सोवियत रशियोत्तर जगात भारताला नवीन आणि जवळचे मित्र मिळवून दिले. त्यांच्यामुळे आज भारत धनसंपन्न आहे आणि होतोय, अधिकाधिक असमान, शक्तीसंपन्न होतोय, confident होतोय. 

पी.व्ही.नरसिंह रावांना आज कॉंग्रेस मध्ये काहीही स्थान नाही. जग त्यांना विसरले आहे. भारत त्यांना विसरला आहे. अगदी जाणीवपूर्वक. पण, आधी म्हंटल्या प्रमाणे सर्वगुणदोषांसकट ते आजच्या भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत. आजचा भारत रावांचा भारत आहे. 


No comments:

Post a Comment