Sunday 21 May 2017

ख्रिस्ती आणि मुस्लिमांमध्ये असलेला ज्यू विरोध - कारणे आणि इतिहास - २०११ मधील लेख

१. ज्यूंचा द्वेष मुस्लीम आणि ख्रिस्ती खूप करतात. ज्यूद्वेष्ट्या ख्रिस्त्यांची संख्या अमेरिकेत प्रचुर आहे. अगदी हॉलीवूड मधले मोठमोठे लोक यात आहेत. मध्यंतरी मेल गिब्सन असे काही जाहीररित्या बोलला होता. 

२. जगात जे काही वाईट घडते ते ज्यू झायोनिस्ट घडवतात हे मानणारे खूप गोरे ख्रिस्ती आहेत. बहुतांश मुस्लीम देखील हे मानतात. भारतीय उपखंडातील मुस्लीम ज्यू लोक आणि हिंदू (त्यातल्यात्यात ब्राह्मण) एकत्र मिळून कारस्थाने रचतात वगैरे पण बोलतात. पाकिस्तानात हे गेले ४-५ दशके सुरु आहे. भारतात देखील हे रुजले आहे. मुंबईचे माजी पोलीस उपयुक्त हसन मुश्रीफ यांनी लिहिलेल्या  "हू किल्ड करकरे" या पुस्तकात अशीच आगपाखड केलेली आहे.

३. वास्तविक भारतात ब्राह्मणविरोध हा खूप जुना आहे. स्वतः वेदांतदेखील याचे दाखले आहेत (यज्ञ आणि इतर कर्मकांड करणाऱ्या समाजाचा विरोध). नास्तीकात देखील बुद्ध, महावीर, अनेक संत (ज्यात जन्माने ब्राह्मण असलेले देखील आहेत असे), सुधारक वगैरेंनी हा विरोध केला आहेच. पण हा विरोध जेव्हा राष्ट्रद्रोही शक्ती करू लागतात किंवा त्या असल्या लोकांचे सहाय्य प्राप्त करू लागतात तेव्हा लंका आतून फोडणारा विभीषण कोण, याची ओळख पटते. 

४. तसलीच गोष्ट ज्यूविरोधाची आहे. फरक हा आहे, कि आपल्याकडचे ऋषी, संत, विचारक वगैरे मंडळी "राजकारणी" नव्हती. कारण भारतीयांची मानसिक "ऑपरेटिंग सिस्टीम" जिला आपण "धर्म" म्हणतो त्या धार्मिक व्यवस्थेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ अगदी आधीपासून वेगळे ठेवल्या गेले आहेत, अगदी कटाक्षाने. मध्यपूर्वेच्या व्यवस्थेत हे अगदी १८व्या-१९व्या शतका पर्यंत शक्य नव्हते. त्यामुळे ज्युद्वेश हा नेहमी राजकीय आणि सामरिक रुपात प्रकट झाला आहे. धर्म (याला सनातन धर्म पण म्हणतात) हा मूलतः "सेक्युलर" आहे. सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे - रिलीजन आणि स्टेट चे सेपरेशन... म्हणजेच धर्म-अर्थ आणि मोक्ष यांचे सेपरेशन.  धर्म म्हणजे घटना, न्याय, code of conduct,  आचारसंहिता... 

५. ख्रिस्ती आणि मुस्लीम ज्यूंचा द्वेष का करतात याची एक कथा आहे. आणि ती कथा आधुनिक काळात मूलनिवासी किंवा संभाजी बिग्रेड वाले, किंवा द्रमुक वाले, कांचा इलाईया वगैरे मंडळी ब्राह्मणांचा द्वेष का करतात, याच्याशी थोडीबहुत सिमिलर आहे. 

६. ज्यू म्हणजे अब्राहम याची परंपरा. त्या कालानुरूप त्यांचे जे विचार, घटना, संहिता, समज वगैरे होते ते सगळे बायबल च्या जुन्या करारात नमूद केलेले आहे. हळूहळू हे "एका ईश्वरास" मानणारे अब्राहम चे वंशज कालांतराने "एकाच ईश्वरास" मानू लागले. म्हणजे जसे आपल्याकडचे वैष्णव विष्णूला आराध्य मानतात, इतर देवांना विष्णूचे सहकारी मानतात, पण त्यांचे अस्तित्व नाकारत नाहीत. तसेच याह्वेह या देवतेला पूजणाऱ्या संप्रदायाचे लोक कालांतराने याह्वेह हाच एकमेव ईश्वर आहे, असे मानू लागले. हे लोक इजिप्त मध्ये राहायचे. त्याकाळी तिथे तिथला राजा (ज्याला फेरोह म्हणतात) तो ईश्वर असतो, असा तिथल्या लोकांचा समज होता. अब्राहम च्या सांगण्यावरून ज्यूंनी याह्वेह हा त्यांचा प्रमुख देव आहे हे म्हणणे सुरु केले आणि म्हणून त्यांची इजिप्त मधून हकालपट्टी झाली. पुढे मोझेस (अरबी मध्ये मुसा) च्या नेतृत्वाखाली या लोकांनी ४० वर्षे सिनाई च्या वाळवंटात भटकून जो आजचा इस्राईल तिथे पोहोचले.

७ .पूर्व (भारत) आणि प्राचीन ग्रीस आणि रोम यांच्यातील व्यापाराचा एक महत्वाचा बिंदू म्हणजे जेरुसलेम (हिब्रू मध्ये येरुशलाईम). वाळवंटात हा एक सुपीक ओएसीस आहे आणि जवळच जॉर्डन नदी डेड सी (मृत समुद्र) ला मिळते. इथे पारशी लोकांची सत्ता होती आणि कानान नावाची टोळी या संपूर्ण जॉर्डन नदीच्या परिसरात वास्तव्यास होती. पारशी राजे यांचा संप्रदाय हा खूप वैदिक श्रौत संप्रदायाशी मिळताजुळता आहे.

८. प्राचीन भारतात किंवा "आर्यावर्तात" (जो इराण पासून ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला होता, अनेक आर्य लोक राज्य करीत असत. हा महाभारताच्या पूर्वीचा काळ आहे जेव्हा सरस्वती नदी पूर्ण भरात वाहायची आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीची शहरे हळूहळू वासू लागली होती. तेव्हा पंजाबात भरत नावाचे लोक वसत. त्यांचा राजा सुदास आणि पुरोहित वशिष्ठ ऋषी होते. कुभा नदी (आजची काबुल) आणि त्या आसपास इतर आर्य लोक राज्य करीत. चामयाननावाच्या आर्यप्रमुखाच्या नेतृत्वाखाली आणि गाधी नावाच्या वैदिक राजाचा मुलगा "विश्वामित्र" ज्याने क्षात्रवर्ण सोडून ब्राह्मण वर्ण पत्करला होता, त्याच्या पौरोहित्याखाली दहा राजांची एक युती बनवली. हे राजे आजच्या अफगाणिस्तान आणि भारतानजीकच्या इराण (थोडक्यात सिंधू च्या पश्चिम तीरावर असलेले) इथले होते. या युतीने पंचनद वर आक्रमण केले. इंद्राच्या मदतीने आणि वशिष्ठाच्या पौरोहित्य मुळे इथला राजा सुदास याने परूष्णी नदीच्या तीरावर (म्हणजे रावी नदी, आजच्या लाहोर जवळ) या दहा राजांच्या सैन्याचा एकत्रित पराभव केला आणि सप्तसिंधू चे रक्षण केले. याला दाशराज्ञ युद्ध म्हणतात.

९ .या आक्रमक अश्या दहा टोळी मध्ये "अनु" नावाचे एक लोक होते. याच अनु वरून "यवन" हा शब्द आला आहे. कालांतराने हे लोक मुस्लीम झाले आणि अनार्य झाले कि गोष्ट पुढची. पण स्वतः इराण हे नाव "आर्यानाम वाजैः" या पारशी म्हणीवरून पडले आहे. याचे संस्कृत रूप म्हणजे आर्यानाम वासैः - आर्यांचे वसतीस्थान. भारतावरील इराणी आर्यांचे आक्रमण भारतीय आर्यांनी परतवून लावले (पुढे अनेकदा). पण यांची पश्चिमेकडे सत्ता ग्रीस पर्यंत पोहोचलेली. येरुशलाइम चा भाग यांच्याच ताब्यात होता. 

१०. जेव्हा मुसा येरुशलाइम जवळ पोहोचला त्याने ज्यूंना हुकुम सोडला कि कानान जातीचा निर्वंश करा. तेव्हा एक खूप मोठा नरसंहार करून ज्यूंनी इस्राईलची भूमी हस्तगत केली. आणि पुढे तिथे त्यांच्या सोलोमन (अरबी मध्ये सुलेमान) नावाच्या राजाने याह्वेह देवतेचे मोठे मंदिर बांधले. 

११. या घटनेनंतर ज्यूलोकांनी परत असा हिंसाचार केल्याचे वाचनात नाही. पण यांनी हा हिंसाचार ईश्वराचे अधिष्ठान समजून आणि "अविश्वासू लोकांना" आपल्या देवाने केलेली शिक्षा असे म्हंटले आणि इथून "काफिर" कि संकल्पना उद्भवली. 

१२. वर मुद्दा क्रमांक ८ मध्ये उल्लेखिलेल्या इराण आणि दाशराज्ञयुद्धाचा संबंध काय हे वाचकांना वाटत असेल. तर याचे उत्तर मुद्दा क्रमांक ६ मध्ये आहे. इराणी आर्य यांच्यातील अनु या टोळी मध्ये झरतुष्ट्र नावाचे ऋषी उद्भवले. साधारण बुद्धाच्या ५०० वर्षे अगोदर. वैदिक आर्यांच्यात असेल्या अनेक देवतांपैकी त्यांनी "अहूर माझदा" नावाच्या देवतेला सर्वोच्च स्थान दिले. इथे अहूर म्हणजे असुर. माझदा म्हणजे नक्की कोण हे माहिती नाही पण बहुतेक महादेव या शब्दाचे पारशीकरण आहे. हा पारशीलोकांचा महादेव म्हणजे आपला रुद्र किंवा शंकर हे कळावयास मार्ग नाही. दुसरे एक दैवत म्हणजे यम ज्याला पारशीभाषेत जमशेद म्हणतात. असो. भारतात प्रचलित असलेल्या सर्व संकल्पनांचे विपरीत संदर्भ प्राचीन पारशी जीवन पद्धतीत सापडतात. भारतात चांगल्या शक्तींना आपण देव म्हणतो, इरणात ते वाईट शक्तींना देव म्हणत. इथे आपण असुर म्हणजे वाईट समजतो, तिथे अहूर हे चांगले गण आहेत. बाकी मित्र, वरुण, इंद्र, अग्नी वगैरे सगळे देव (कि अहूर) तसेच आहे. आपल्यासारखा यज्ञ ते लोक करतात. वर्णव्यवस्था आहे (होती). जानवे घालीत (अजूनही घालतात, पण उलटे). यांनी हळूहळू अहूर माझदा हा प्रमुख देव आणि इतर सगळे सहकारी हि कल्पना सुरु केली. अहूर माझदाचे उपासक "स्वर्गात" जातील आणि अनुपासक नरकात. स्वर्ग आणि नरक या संकल्पना याच पारशी झारतुष्ट्रीय प्रणालीने जगाला दिल्या आहेत. भारतात या संकल्पना खूप उशिरा आल्या आणि कर्मसिद्धांत प्रचलित असल्यामुळे इथे स्वर्ग आणि नरक कायमचे नसतात. वेळ संपली कि दोन्ही सोडून जीव परत जन्म घेतो, हि मान्यता.

१३. पण हीच संकल्पना पश्चिमेत या यहुदी (ज्यू) लोकांनी उचलली आणि याह्वेहचे हळूहळू आराध्यदेवतेपासून एकमात्र ईश्वर असे रुपांतर झाले. अब्राहमच्या काळात याह्वेह एक प्रमुख देव होता (अहूर माझदा किंवा वैष्णवांच्या अथवा शैवांच्या विष्णू/शिवासारखा). पण मुसाच्या काळात आणि त्यानंतर प्रमुख देवाचे रुपांतर एकाच खऱ्या देवात झाले आणि यास न मानणारे हे काफिर ठरले आणि कानान च्या नरसंहारानंतर काफरांचे भविष्य एकच - ते म्हणजे मौत आणि नंतर नरक (कायमचा - कयामत पर्यंत आणि त्यानंतर देखील). 

१४. येरुशलाइमला वस्ती केल्यावर हे लोक भारत-चीन आणि पश्चिम (ग्रीस-रोम-फिनीशिया) वगैरे भागातील व्यापारातले केद्रबिंदू बनले आणि मालदार बनले. इराणच्या राजांनी मुद्दा क्रमांक १० मध्ये वर्णिलेल्या प्रसिद्ध सोलोमनने बांधलेल्या याह्वेह मंदिरांना तीन वेळेला तोडले. दोन वेळेला ज्यूंनी ते परत बांधले. नंतर त्यांची सत्ता जाऊन तिथे रोमन सत्ता आली आणि त्या मंदिराची फक्त एक भिंत आज येरुशलाइम मध्ये उभी आहे. ती भिंत आज समस्त ज्यूंसाठी पवित्र स्थान आहे. तिथे हे तुटलेले मंदिर परत बनेल या भविष्यावर विसंबून. तिथे आज अल-अक्सा म्हणून मशीद आहे जे पूर्वी एक चर्च होते.

१५. इराण आणि रोम यांच्यात चालू असलेल्या संघर्षात यांनी ज्युलियस सीझर च्या आक्रमणापुढे नमते घेऊन रोम चे मांडलिकत्व पत्करले आणि तेव्हा पासून ज्यू पाश्चात्य "शक्ती"च्या अंकित राहिले. यापुढे त्यांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व १९४८ मध्येच आले आणि आताही ते पश्चिमेच्या "अंकित" आहेत. असो. तो मुद्दा वेगळा.

१६. हा जो "एकेश्वरवाद" ज्यूंनी शोधला, त्याला रिफाईन केले ते येशू ख्रिस्ताने आणि नंतर मोहम्मद ने. या दोघांनी "काफिर" हि संकल्पना क्रमशः प्रगत केली. तसे पाहिले तर ज्यू लोक स्वर्ग मानीत नाहीत, फक्त नरक मानतात आणि याह्वेह हा एक खरा ईश्वर नाही असे म्हणणारा नरकात जातो असे मानतात. ख्रिस्त्यांनी स्वर्ग देखील आणला आणि एकेश्वरास (म्हणजे याह्वेला) न मानणारा नरकात जातोच, पण मानणारा स्वर्गात जातो हा इंसेंटीव जाहीर केला. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या ४०० वर्षानंतर एक "बायबल-नवा करार" नावाचा ग्रंथ सरकारमान्य झाला. येशूच्या आयुष्याबद्दल सांगणारे अनेक समकालीन पुरावे (किंवा बखरी) होते. यांच्यातील चार अश्या बखरी निवडल्या ज्या ख्रिस्ताचे देवत्व सिद्ध करतात. इतर सगळ्या बखरी ज्या त्या सिद्ध करीत नाहीत त्यांना नाकारले. हे ज्या संमेलनात ठरले त्याला कौन्सिल ऑफ नीस असे म्हणतात. 

१७. ख्रिस्त हा देव आणि देवपुत्र दोन्ही आहे. देव म्हणजे एकमेव ईश्वर याह्वेह. हे जो मानतो तो इ.स ४०० नंतर ख्रिस्ती अशी व्याख्या प्रचलित झाली आणि रोमन काथोलिक चर्च प्रस्थापित झाला. ज्यू लोकांनी येशूला याह्वेह म्हणणे नाकारले आणि पुरावा म्हणून बायबलचा जुना करार दाखवू लागले. आता ख्रिस्त्यांना बायबलच्या जुना करार नाकारून चालणार नाही कारण याह्वेह आणि त्याचे एकेश्वरत्व तिथूनच आलेले आहे. जर जुना करार नाकारला तर ईश्वराचे अस्तित्वच नाकारले जाईल. म्हणून ती जुनी अब्राहामाची परंपरा ख्रिस्त्यांना हवी असते. पण त्या परंपरेचा निष्कर्ष म्हणजे येशू ईश्वरपुत्र नाही, हे मान्य नाही. 

१८. हे सगळे करणारे रोमन साम्राज्यातले मोठे कर्तेधर्ते होते. ज्यात स्वतः रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन हा होता. यानेच नीस ची कौन्सिल बोलावली, रोमन साम्राज्याचा अधिकृत रीलीकन ख्रिस्ती केला आणि सोयीनुसार हवे ते बदल करून घेतले. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीस आणि रोम चे सर्व सणवार तसेच ठेऊन त्यांना नवीन नाव देण्यात आले. उत्तरायण सुरु होण्याच्या सणाचे युरोपात फार महत्व आहे. सध्या तो २२ डिसेंबर ला असतो, पण त्याकाळी तो २५ डिसेंबर ला येई. (पृथ्वीच्या अक्ष स्वतःभोवती फिरतो, तसे ऋतू बदलतात. जसे पानिपतच्या वेळेस मकर संक्रांत १० जानेवारीला येई, विवेकानंदाच्या वेळेस १२ ला, आजकाल १४ला आणि हळूहळू १५ ला होते आहे, तसे). जुन्या करारानुसार ख्रिस्ताचा जन्म उन्हाळ्यात झाला होता. पण नवीन करार हा जन्म डिसेंबरमध्ये घेऊन आला.

१९. तीच गोष्ट इस्लाम ची. "अल्ला" हि अरबस्तानातल्या कुरेशी टोळी ची कुलदेवी. त्यांच्या चंद्र अथवा सोम या देवतेचे स्त्रीरूप. मोहम्मद ने याच "अल्ला" या देवीचा संबंध ज्यूंच्या याह्वेहशी जोडला. अल्ला "पुरुष" झाला आणि मोहम्मद त्याचा शेवटचा प्रेषित. प्रेषितांची मालिका एडम (आदम) पासून सुरु होऊन अब्राहम (इब्राहीम), मोझेस (मुसा), येशू (इसा) करत करत मोहम्मद पर्यंत येऊन थांबते. ज्यू लोक या निष्कर्षाला नाकारतात कारण जुन्या करारात हे असले काही नाही. मुस्लिमांना जुना करार "खोटा" आहे हे म्हणणे शक्य नाही करण मग मोहम्मद कुरणात जे काही बोलला ते देखील खोटे ठरते. पण ज्यू जो पर्यंत आहेत तो पर्यंत जुन्या करारावरती हक्क गाजवता येत नाही. 

२०. जुना करार आणि त्यातील प्राचीन परंपरेचे आपण एकमेव वारसदार आहोत हे सिद्ध करायची चढाओढ ख्रिस्ती आणि मुस्लीम लोकांमध्ये लागली असून ती गेली १४०० वर्षे अविरत सुरु आहे आणि यामध्ये फरफट झाली ती ज्यू लोकांची. 

२१. आता आपल्याला वाटेल कि यात भांडण्यासारखे काय? हा प्रश्न यासाठी पडतो कारण आपण याकडे आपल्या भारतीय दृष्टीने विचार करतो कि मोक्षमार्गाचा वारसा सांगायला इतकी कुतरओढ का? कारण आपण हे विसरतो कि या व्यवस्थेत भारताप्रमाणे मोक्ष आणि अर्थ वेगळे नाही होऊ शकत. या मोक्ष मार्गाचे निमित्त घेऊन कत्तली झाल्या, साम्राज्ये बनली आणि मोडली, गुलामगिरी आली, वसाहतवाद उद्भवला, आजची सर्व अर्थव्यवस्था उदयास आली. हे सगळे या व्यवस्थेत institutionalize झाले आहे. व्यवस्थेचा मूलभूत भाग. यावर मनापासून विश्वास ठेवणारे लोक अमेरिकेसारख्या अथवा इंग्लंड आणि रोमन साम्राज्य, तुर्की खिलाफत, मुघल साम्राज्य, नादिरशाह चे इराणी साम्राज्य वगैरे आजी-माजी साम्राज्यांमध्ये कार्यरत राहून अर्थनीती, युद्धनीती, परराष्ट्रनीती, गृहनीती इत्यादी ठरवल्या आहेत. चढाया केल्या आहेत. 

२२. जर हा हक्क सोडला तर या सगळ्या आजी-माजी नीतीच फोल ठरतील. म्हणून या दोन संप्रदायातील लोकांना ज्यू नको आहेत पण त्यांची परंपरा हवी आहे. ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ला ज्यूंनी घडवले हि वावडी जगात सगळे वाईटसाईट कारस्थानी ज्यू श्रीमंत व्यापारी घडवतात हे पश्चिमेतली खूप पॉप्युलर दंतकथा आहे, त्याचाच एक हिस्सा आहे. मुस्लीम जगतात देखील हि दंतकथा होती आणि १९४८ नंतर हळूहळू हिला लोकमान्यता प्राप्त होऊ लागली. याला कारण देखील आहे. इंग्लंड आणि फ्रांस मधील ज्यू व्यापाऱ्यांनी जमिनी हळूहळू विकत घेऊन आजचा इस्राईल बनवला. खूप रोचक इतिहास आहे तो, पण तो पुन्हा कधी. त्यामुळे मधली काही शतके दबून असलेला मुस्लिमांचा ज्यूविरोध परत उफाळून आला आणि आता तर त्याला भरती येत आहे. 

२३. वर मुद्दा क्रमांक ३ आणि ५ मध्ये मी याची तुलना मूलनिवासी किंवा संभाजी बिग्रेडी टाईपच्या लोकांच्या ब्राह्मणविरोधाशी का केली हे वरील मुद्द्यांवरून समजेलच. ती आयडिया तिथे चालली तर भारतात देखील चालेल हा तिथल्या "सूत्रधारांचा" गैरसमज आहे. म्हणूनच लक्ष्मण माने टाईप चे लोक वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्च चे सभासद वगैरे होऊन तिथे हिंदूंना आणि ब्राह्मणांना शिव्या काय घालतात, पोलीस आयुक्त मुश्रीफ पाकी लोकांसारखे बोलू काय लागतात, त्यांना संभाजी बिग्रेड समर्थन काय देते, मग पाकिस्तानात २६/११ चा मुंबई हल्ला ब्राह्मणांनी घडवला, हेमंत करकरेंना संघाच्या आणि आयबी च्या ब्राह्मणांनी मारले ते देखील इस्राईलच्या ज्यूंची मदत घेऊन हि असली धेडगुजरी वावडी काय उठवण्यात येते, तिला भारतात पॉप्युलर करणारे उच्चपदस्थ लोक पुढे काय येतात, हे सगळे एकमेकात गुंतलेले आहे. जसा ज्यूद्वेष ख्रिस्ती आणि मुस्लीम व्यवस्थेत institutionalize झाला आहे, तसाच ब्राह्मणद्वेष भारतात institutionalize करायचा हा प्रयत्न आहे. 

२४. काही चांगल्या लोकांना हे समजले आणि त्यांनी लेखणी शांत केली. खरा विरोध ब्राह्मणांना किंवा "ब्राह्मण्याला" नसून त्याच्या झालेल्या दुरुपयोगाला आहे. जर तो दुरुपयोग झाला नसता आणि जातीने ब्राह्मण असलेले काही लोक "माजले" नसते तर जे अत्याचार झाले ते झाले नसते. खरा प्रॉब्लेम तो "माज" आणि ती वृत्ती आहे, जात नव्हे. हे काही लोकांना समजले आहे आणि ते असल्या खेळात बाहुले होणे नाकारतात. 

२५. उरलेले काही जाणूनबुजून बाहुले होतात कारण त्यांचा निहित राजकीय आणि आर्थिक स्वार्थ, तर काही लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ख्रिस्ती आणि मुस्लीमात असलेल्या ज्यूद्वेष्ट्यांचे देखील हेच दोन प्रकार आहेत. 


सध्याच्या जगात, इस्राईल हा भारताचा मित्र आहे. आणि ज्यू हे हिंदूंचे मित्र आहेत. जर इस्राईल नष्ट झाले अथवा ज्यू तिथून परत हाकलल्या गेले तर भारतावर पुन्हा बिकट परिस्थिती येईल.

No comments:

Post a Comment